देवशयनी आषाढी एकादशी म्हटली कि डोळयांसमोर
उभे राहतं ते अठ्ठावीस युगे विटेवर उभं असणारं सावळं विठ्ठलाचं रूप ..
आणि तहानभूक हरपून पंढरीची वाट चालणारी वारकऱ्यांची मांदियाळी ..
विठूमाऊलीच्या ओढीनं अष्टदिशांतून जणू भक्तीचा गजर करत
लाखो वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी येतात .
आजच्या दिवशी रुक्मिणीच महत्त्व देखील तितकंच !
तुझ्याविना वैकुंठाचा कारभार व्यर्थ आहे . विठू सोबत तुझं
असणं तितकंच महत्त्वाचं .
पाऊस-पाणी वादळवाऱ्याची तमा न बाळगता बायाबापडी
विठूच्या नामात दंगून जातात .
आपला महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा राष्ट्र आहे .
संतांचे हे सामाजिक कार्य गेल्या अनेक शतकांपासूनच चालत आलेलं आहे .
संत म्हणजे निस्वार्थ मनाने कोणतीही अपेक्षा न ठेवता देवासाठी केलेली प्रार्थना ,
तसेच आपला उद्देश स्पष्ट ठेवून समाजाची मदत करणारी एक जबाबदार व्यक्ती !
आणि संतांचं भक्तीस्थान म्हणजे पंढरीचा पांडुरंग हरी आणि
विठ्ठलभक्ती हेच जीवनाचं सार .
आपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले
त्यातीलच काहींचा जीवनप्रवास मी संक्षिप्त स्वरूपात
मांडण्याचा प्रयत्न करत आहे .
![](https://marathiblogwali.in/wp-content/uploads/2024/03/image-1-1024x1024.png)
विठ्ठल- रुख्मिणी एकादशी। संतभूमी – महाराष्ट्र । Vitthal-Rukmini Ekadashi Pandharpur
संत ज्ञानेश्वर हे आपल्या महाराष्ट्रातले इ . स . १२ व्या
शतकातील असे एकमेव संत . ज्यांनी वयाच्या
१२व्या वर्षीच “ज्ञानेश्वरी” (भावार्थदीपिका) लिहिली .
ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे (इ. स. १२७५) रोजी झाला .
त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई होते .
तसेच त्यांना निवृत्ती ,सोपान आणि मुक्ताई अशी तीन भावंडे …
आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना आणि त्यांच्या भावंडांना समाजाने
त्यांना नाकारलं ,परंतु खचुन न जाता त्यांनी त्यांचं कार्य चालूच ठेवलं .
त्यानंतर त्यांनी पैठणला त्यांची विद्वता सिद्ध केली .
संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली .
|| माझा मराठीची बोलू कौतुके
परि अमृतातेहि पैजासी जिंके
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान ,मराठीची महती सांगितली .
त्यांचा दुसरा ग्रंथ अमृतानुभव हा विशुद्ध-जीव-ब्रम्हा ऐक्याचा ग्रंथ आहे .
चांगदेव पासष्टी याग्रंथांद्वारे त्यांनी चांगदेवाचे गर्वहरण केले .
तसंच त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद वधवले . तसेच चांगदेवाचे
गर्वहरण करताना भिंत चालवली .
जो जे वांछील ,तो ते लाहो ,असे म्हणत त्यांनी “पसायदान”लिहिले .
संतवर्य ,वारकरी संप्रदायसह ,सर्व भक्तवर्ग ज्ञानदेवांना प्रेमाने “माऊली ” म्हणत .
अवघ्या २१व्या वर्षी , आळंदी येथे इंद्रायणी काठी संजीवन समाधी त्यांनी घेतली .
![](https://marathiblogwali.in/wp-content/uploads/2024/03/image-2-704x1024.png)
राम कृष्ण हरी 🙏
संत गोरा कुंभार ,संत सावतामाळी ,संत चोखामेळा
या अनेक संतांनी वाङमय निर्मितीबरोबर यशस्वी
लोकशाहीचे बीज रोवण्याचा प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात
वारकरी सांप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य केले .
प्रत्येक संतांचे दैवत म्हणजे “अफाट विठ्ठल भक्ती ” !
अभंग म्हणजे भंग-न-पावणारे अन अभंग म्हटल्याबरोबर
आपल्या डोळ्यासमोर उभे ठाकतात ते थेट “संत तुकाराम !”
त्यांचं पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले . जन्म इ.स. १५९८ रोजी पुणे
येथील देहू गावात झाला . तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये
मतभेद आहेत . त्यांचे घराणे मोरे क्षत्रिय .. वारीची परंपरा त्यांच्या
घरात फार पूर्वीपासूनच होती . त्यांचे वडील बोल्होबा आणि
आई कनकाई , मोठा भाऊ सावजी तसंच लहान भाऊ कान्होबा
आणि एक बहीण असं कुटुंब ..
प्रथम पत्नी ह्यात असतानाच तिच्याच साक्षीने तुकारामांनी
पुण्याचे अप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवली) हिच्याशी लग्न केले .
तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तीचे तडाखे सहन करावे लागले .
दुष्काळामुळे त्यांना संसारात विरक्ती आली .
दम्याच्या त्रासाने आणि भयंकर दुष्काळ पडल्याने
त्यांची प्रथम पत्नी रखमा आणि लहान मुलगा संतोबा मरण पावले .
अशा परिस्थितीतही न हारता त्यांची पत्नी आवलीने
अगदी धीराने त्यांच्या संसाराचा भार पेलला .
दुष्काळात त्यांनी भंडारा डोंगरावर जाऊन विठ्ठलाची
उपासना सुरु केली . चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेताना
त्यांना विठ्ठलाचा साक्षात्कार झाला . तेथेच
परम ब्रम्हस्वरूप श्री विठ्ठल त्यांना भेटला .
तुकारामांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त व्हायचे होते ,
म्हणून सर्व दाग -दागिने त्यांनी गावकऱ्यांना परत देऊन ,
गहाणखते इंद्रायणी नदीत टाकून दिली .
तीन वर्षानंतर आलेल्या पावसाने तुकोबांना अभंग स्फुरला .
|| आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंद चि अंग ,आनंदाचे ||
देहू गावातील मंबाजी नामक स्वामीने तुकारामांना खूप त्रास दिला .
पण अत्याधिक अधिकार ओळखून त्याने रामेश्वर भटांच्या साहाय्याने
तुकारामांच्या अभंग गाथा बुडवून टाकण्याची शिक्षा दिली .
परंतु तुकारामांच्या तपश्चर्येमुळे त्यांच्या गाथा इंद्रायणीतुन वर
तरंगू लागल्या व रामेश्वर भटांना त्यांची चूक उमगली व
त्यांनी तुकारामांची आरती लिहिली .
तुकाराम महाराज हे साक्षात्कारी ,निर्भीड व
एका अर्थाने बंडखोर संत कवी होते .
|| वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठाव
इतरांनी वहावा भार माथा ||
असे परखड विधान तुकोबाराय अभिमानाने करतात .
तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी ।
भक्ती-ज्ञान वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी
परब्रम्हाच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते .
||आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू||
असे म्हणत शब्दांवर प्रभुत्त्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले .
जतिभेदावर सडसडून टीका केली .
श्री विठ्ठलाचे वर्णन तुकोबा अत्यंत मनोभावे करतात तो असा की ,
।। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवूनिया
तुळसी हार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर हेचि रूप
मकरकुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणि विराजित
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख
पाहिन श्रीमुख आवडीने ।।
तुकारामांचा “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ” हा अभंग जरी विठ्ठलासाठी असला तरी ,
त्यांच्या पत्नी आवलीला काहीसा लागू होतो तो असा ,
जगण्याच्या समईत तुझ्या अभंगाच्या वाती ,वादळात चालताना तू माझा रे सांगाती ,
तू माझा सांगाती ..!
राम कृष्ण हरी 🙏
विठ्ठल- रुख्मिणी एकादशी। संतभूमी – महाराष्ट्र । Vitthal-Rukmini Ekadashi Pandharpur
तुकारामांच्या प्रत्येक अभंगात तुका म्हणे हि ओळ असायचीच .
अन आजदेखील त्यांचे अभंग आपण आवडीने ऐकतो.
व ते कित्येकांचे मुखोतग्त आहेत . गरुडावर स्वार होऊन विठ्ठल
त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेला असे मानले जाते.
फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले, असे मानले जाते.
हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.
आजच्या दशकात स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा
लावून काम करते परंतु संतांच्या शतकात काही
अशाही स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी अभंग , ओव्या लिहिल्या
अन समाजप्रबोधन केलं . त्यापैकीच संत जनाबाई ,
संत मुक्ताई ,संत सखुबाई, संत बहिणाबाई या होत्या .
संत जनाबाई ओव्या खूप छानरीतीने करत .
खरंतर ओवी म्हणजे एकप्रकारचं “काव्य”. जनाबाईंचा जन्म
परभणी येथील गंगाखेड येथे दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला .
जनाबाईंच्या एका अभंगातील माझ्या वडिलांचे दैवत तो
हा पंढरीनाथ या ओळींवरून त्यांचे वडील वारकरी असावेत
अशी शक्यता वर्तवण्यात येते . त्यांच्या आईचे नाव करुंड
त्याही भगवन्दक्त होत्या . संत जनाबाई या संत कवियत्री
म्हणून जनमनात लोकप्रिय आहेत . महाराष्ट्राच्या
खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना ,कांडताना
त्यांच्या ओव्या गातात . तिच्या वडिलांनी तिला नामदेवांचे
वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे कामासाठी पाठवले .,
तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या .
त्या स्वतःला “नामयाची दासी ” मनवून घेत असत .
संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनी विठ्ठलभक्तीचा ध्यास घेतला .
।। दळिता कांडिता तुज गाईन अनंता ।।
असं त्या म्हणत गौऱ्या-शेण्या थापताना ,इतर कामे करत
असताना सतत विठ्ठलाचे नामस्मरण करीत .
![](https://marathiblogwali.in/wp-content/uploads/2024/03/image-4.png)
संत जनाबाई विठ्ठलभक्ती अत्यंत मनापासून करायच्या .
कोणाच्या मनांत मोगब-बिगम्ब भावना येऊ नयेत
म्हणून जनाबाई पांडुरंगाला “पिता ” म्हणतात
हे त्यांच्या एका अभांगातून आपणांस कळते .
।। जनी उकळते वेणी ,तुळशीच्या बनी
हाती घेऊनिया लोणी ,डोई चाली चक्रपाणी
माझ्या जनीला नाही कोणी ,म्हणून देव घाली पाणी
जनी सांगे सर्व लोकां ,नाहू घाली माझा पिता ।।
जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी ,
आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ या दिवशी समाधिस्थ
होऊन पांडुरंगाचरणी विलिन झाल्या .
राम कृष्ण हरी 🙏
विठ्ठल- रुख्मिणी एकादशी। संतभूमी – महाराष्ट्र । Vitthal-Rukmini Ekadashi Pandharpur
वारकरी संतांमध्ये अशी अनेक नावं ज्यांनी समाजप्रबोधन
केलं त्यापैकी नामदेव महाराज,आधुनिक संत रामदास स्वामी ,
तुकडोजी महाराज ,गाडगे महाराज , गगनगिरी महाराज ,
गजानन महाराज इत्यादी तसेच सध्याचे वामनराव पै ,दयानंद सरस्वती
असे अनेक संतांनी समाजात असलेल्या अनेक अनिष्ठ प्रथा ,
तसेच जातीभेद ,वर्णभेद ,अस्पृश्यता याला कडाडून विरोध केला
व समाजप्रबोधनाचे कार्य केले .
अशा अनेक महान व्यक्तीमुळेच
आपल्या महाराष्ट्राला “संतभूमी ” म्हणून ओळखलं जातं .
|| बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ,श्री ज्ञानदेव ,तुकाराम ,पंढरीनाथ महाराज कि जय ||
||जय जय पांडुरंग हरी || राम कृष्ण हरी 🙏
Also Read: Shri Vitthal Rukmini Mandir, Pandharpur
Also Read: महाशिवरात्री विशेष | Maha Shivaratri 2024 ॐ नमः शिवाय 🙏 – मराठी BlogWali (marathiblogwali.in)